महानगरपालिकेची चार वर्षे पूर्ण; आत्मचिंतनाची गरज – शशांक बावचकर
इचलकरंजी, दि. ३० जून :
इचलकरंजी नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर होऊन चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहराच्या विकासाचा आढावा घेऊन आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी व्यक्त केले.
महानगरपालिका स्थापनेनंतर सुरुवातीची साडेतीन वर्षे प्रशासकीय राजवट राहिली. या काळात प्रशासकीय व आर्थिक शिस्त अपेक्षित पातळीवर निर्माण झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. विविध विभागांतील निविदा प्रक्रिया, बायोमायनिंग, मजरेवाडी योजना बळकटीकरण, ५५० कोटींची ड्रेनेज योजना, नवीन सभागृह खर्च आणि माझी वसुंधरा अभियानातील कामांबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले.
लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेत आल्यानंतर नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना पुरेशी माहिती व प्रशिक्षण न देता प्रशासनाच्या धोरणानुसार काम करण्याचा दबाव असल्याचा दावा त्यांनी केला.
शहरातील नियमित व शुद्ध पाणीपुरवठा, दैनंदिन स्वच्छता, खराब रस्ते यांसारखे मूलभूत प्रश्न अद्याप कायम असल्याची टीका त्यांनी केली. तसेच महानगरपालिकेच्या उत्पन्नात वाढ न झाल्याने आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचे नमूद केले.
सत्ताधारी व विरोधी सदस्यांनी शहरहिताला प्राधान्य देत आत्मपरीक्षण करून नागरिकांचा लोकनियुक्त कारभारावर विश्वास निर्माण करावा, अशी अपेक्षा बावचकर यांनी व्यक्त केली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







