अलमट्टी धरणाबाबत केंद्र सरकारने निपक्षपाती निर्णय घ्यावा-समाजवादी प्रबोधिनीतील चर्चासत्रात सुर
इचलकरंजी ता.२७ अलमट्टी म्हणजे अलमट्टी गावात असलेल्या लाल बहादूर शास्त्री धरणाच्या उंचीवाढीचा विषय हा केवळ राजकीय नफ्या तोट्याचा नाही तर लोकजीवनाच्या जिव्हाळ्याचा किंबहुना जीवन मरणाचा प्रश्न आहे . त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने नि :पक्षपाती, पारदर्शक निर्णय तातडीने घेण्याची गरज आहे. तसेच दोन्ही राज्यांनीही समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे.अलमट्टीचा विसर्ग स्थगित झाला तर कोल्हापूर ,सांगली व काही प्रमाणात सातारा जिल्ह्यालाही महापुराचा फटका सहन करावा लागतो हे सत्य आहे. या पार्श्वभूमीवर पाणी साठा वाढवण्यासाठी जलाशयातील गाळ काढण्यापासून विसर्गाचे नेमके वेळापत्रक तयार करण्याची, त्यासह इतर अनेक बाबींच्या पूर्ततेचीही गरज आहे. तसेच जलतज्ञांच्या सल्ल्याने याबाबत नेमके धोरण आखण्याची तातडीची गरज आहे.अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात होणारा सर्व पक्षीय तीव्र विरोध हा महापुराचा महाभयंकर फटका वारंवार अनुभवाला आल्यामुळे होत आहे. या लोकभावनेचाही विचार झाला पाहिजे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले ” अलमट्टीची उंची वाढ व त्यातून निर्माण होणारे प्रश्न “या विषयावर हे चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी ,शशांक बावचकर, अशोक केसरकर, सचिन पाटोळे ,पांडुरंग पिसे ,देवदत्त कुंभार ,रामचंद्र ठिकणे ,नारायण लोटके, शकील मुल्ला, शहाजी धस्ते आदींनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रात देशभरात धरणाचे दरवाजे उघडल्याने अथवा बंद केल्यानेही वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा फटका बसत असतो. तज्ञांच्या समितीच्या सल्ल्याने अथवा न्यायालयाच्या निकालाने ज्या ठिकाणी धरणाच्या पाण्याचे प्रश्न सोडवले जातात तोपर्यंत ते सुरळीत असते. मात्र राज्याच्या पाणी मागणीतून निर्माण होणारे प्रश्न अधिक तीव्र होत जातात असेही दिसून येते. नैसर्गिक पाऊस पडून येणारा महापौर आणि धरणातून विसर्ग न केल्यामुळे येणारा महापूर याचे स्वरूप व त्यातून होणारे नुकसान याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे. तसेच या किंवा अन्य कोणत्याही प्रश्नामुळे दोन राज्ये एकमेकांपुढे शत्रुत्व भावनेने उभी राहून चालणार नाही. कारण त्यातून राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाऊ शकतो. नदी संवर्धन आणि धरण काळजी हा अतिशय महत्त्वाचा विषय असून त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे मत व्यक्त करण्यात आले. तसेच अलमट्टीची उंची वाढवण्यासाठीचा परवानगी मागणी अर्ज, कोल्हापूर ,सांगली व सातारा या जिल्ह्याला अलीकडे वारंवार येणारा महापूर व त्याची कारणे, धरणाची उंची वाढल्याने निर्माण होणारे प्रश्न, नदी व धरण क्षेत्रातील गाळ काढण्यासह पाणीसाठप क्षमता वाढवण्याचे उपाय, महाराष्ट्र कर्नाटक व केंद्र सरकारची भूमिका, हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठीची उपाययोजना शोधण्याची गरज आदी अनेक बाबींची सखोल चर्चा झाली. यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ पत्रकार चिदानंद अलुरे यांना आदरांजली वाहण्यात आली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







