गुपचूप उद्घाटनावरून टीकेची झोड – शशांक बावचकर यांचा प्रशासनावर घणाघात.
इचलकरंजी-
इचलकरंजी महानगरपालिकेच्या विकासकामांच्या उद्घाटनावरून माजी नगरसेवकशशांक बावचकर यांनी प्रशासनावर व लोकप्रतिनिधींवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत नगरोत्थान व दलित वस्ती सुधार योजनेसाठी ७ कोटी २६ लाखांची मंजुरी मिळाली होती. दोन महिने आधी कार्यादेश तयार झाले, मात्र मक्तेदारांना ते वेळेवर देण्यात आले नाहीत. यासंदर्भात १४ मे रोजी आयुक्तांना लेखी पत्र दिले गेले तरीही दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप बावचकर यांनी केला.
विशेष म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना न देता आणि पत्रकारांनाही माहिती न देता काल अचानक भर पावसात लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत विकासकामांचे गुपचूप उद्घाटन पार पाडण्यात आले. “गोपनीयतेने उद्घाटन करण्याची गरज का भासली? श्रेय ठरल्यावरच उद्घाटन का? पावसात काम सुरु करणे म्हणजे दर्जाशी तडजोड नव्हे का?” असे सवाल त्यांनी उपस्थित केले.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डांबरीकरणाचे काम अलीकडेच थांबले होते मात्र आता महानगरपालिकाच पावसाळ्यात काम सुरू करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “या कामांचा दर्जा खराब झाला तर जबाबदारी प्रशासन आणि मक्तेदारांची असेल,” असा इशाराही बावचकर यांनी दिला.या प्रकरणामुळे शहरवासीयांमध्ये नाराजीचे वातावरण असून प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







