ICHMH51NEWS.IN
9921600800

वस्त्रोद्योगासाठी टेक्सटाईल पार्क सहित इको सिस्टीम उभारणार,शिवाजी महाराजांच्या आदर्श मार्गावर वाटचालीसाठी महायुतीला विजयी करा-अमित शहा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वस्त्रोद्योगासाठी टेक्सटाईल पार्क सहित इको सिस्टीम उभारणार,शिवाजी महाराजांच्या आदर्श मार्गावर वाटचालीसाठी महायुतीला विजयी करा-अमित शहा
इचलकरंजी –
जम्मू-काश्मिर हा भारताचा अविभाज्य अंग आहे. तेथे ३७० कलम पुन्हा आणण्याची धमक कोणातच नसून राहुल गांधी यांच्या चार पिढ्यांनाही ते शक्य होणार नाही असे आव्हान देतानाच महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात टेक्स्टाईल पार्क उभारणीसह कापूस निर्मितीपासून ते एक्स्पोर्टपर्यंतची इको सिस्टिम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात उभारली जाईल, अशी ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी इचलकरंजी येथे बोलताना दिली.
इचलकरंजी, शिरोळ आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे, डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व अशोकराव माने यांच्या प्रचारार्थ येथील श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृह चौकात झंझावात सभेचे आयोजन करण्यात होते. त्याप्रसंगी नामदार शहा बोलत होते.
ते म्हणाले, मागील 60 वर्षात काँग्रेस सरकारने देशाची वाताहात केली. राम मंदिर असो, जम्मू काश्मिरमधील 370 कलम हटविणे असो प्रत्येक गोष्टीला काँग्रेसने विरोध दर्शविला. आपण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराजांच्या पवित्र भूमीत आलो आहे.  पुढील पाच वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या विचाराने जायचे की औरंगजेबाच्या विचाराने जायचे हे ठरवा एकीकडे महायुतीच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास होत असताना आघाडीच्या आश्‍वासनाच्या भुलभुलय्यांना बळी पडायचे,  सनातन धर्माला व राम मंदिराला विरोध करणार्‍या काँग्रेसने सत्तर वर्षात देशासाठी काहीच केले नाही. केवळ तीन कुटुंबांचा उध्दार करुन घेतल्याचा टोला लगावाला.
सन 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदीर्घकाळापासून प्रलंबित राम मंदिर मुद्दा न्यायालयात जिंकला. आयोध्येत राम मंदिराची उभारणी केली. जम्मू काश्मीरमधील कलम 370 कलम हटविल्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदत आहे. जगामध्ये भारताला तिसर्‍या क्रमांकाचा देश बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र त्याला राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आदी मंडळी विरोध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, गुंतवणूक वाढत असताना महाविकास आघाडीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आल्यास शेतकर्‍यांना 12 हजारऐवजी 15 हजार रुपये देऊ, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 1500 ऐवजी 2100 रुपये देऊ, मोफत आरोग्य योजना 5 लाखाऐवजी 10 लाखापर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत आरोग्य सुविधा पुरवू असे, अशी ग्वाही नामदार शहा यांनी यावेळी दिली.
खासदार धैर्यशील माने यांनी, जिथे भगवा असेल तिथे इचलकरंजीकर सदैव पाठबळ देतात. याचा प्रत्यय लोकसभा निवडणूकीत मला आला असून विजयाची खात्री नसतानाही तब्बल 40 हजाराचे मताधिक्य देत या शहराने मला पुन्हा संधी दिली. इचलकरंजीकरांनी खासदार निवडला असून आता आमदार निवडण्याची वेळ आहे. राहुल आवाडे यांची नाळ जनतेशी जोडली गेली असून त्यांनाही शहरवासिय नक्कीच विजयी करतील, असा विश्‍वास व्यक्त केला.
आमदार प्रकाश आवाडे यांनी, आमच्यावर टीका करणार्‍या विरोधकांनी इचलकरंजीसाठी काय केले हे सांगावे. त्यांच्यासोबत सवाल-जबाव करण्यासाठी मी कधीही तयार आहे. विरोधकांकडून केवळ जनतेची दिशाभूल केली जात आहे. इचलकरंजीकरांना कृष्णा योजना बळकटीकरणानंतर एकदिवसआड पाणी मिळणारच हा माझा शब्द आहे. शिवाय सुळकूड योजनाही मार्गी लागणारच आहे. वीजेची सवलत मिळवून दिली म्हणून विरोधक कांगावा करत आहे. पण ती सवलत मी, सुरेश हाळवणकर आणि अशोक स्वामी यांच्या पाठपुराव्यातून मिळाली आहे. जे सांगितलं ते केलं. म्हणूनच भविष्यात संपूर्ण इचलकरंजीत सौरऊर्जा प्रकल्प करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतून राज्यातील अडीच कोटी महिलांना आर्थिक बळ दिले. या महिलांच्या मतावरच किमान 200 आमदार निवडून येतील याची धास्ती विरोधकांनी घेतली आहे. काँग्रेसने केवळ खोटा प्रचार करुन योजना आणल्या पण त्या बंद पाडल्या. पण युती सरकारने मुलींना उच्च शिक्षण मोफत दिले असून जो कोणी त्याची अंमलबजावणी करणार नाही ते कॉलेज बंद होऊ शकते. मी आणि प्रकाश आवाडे यांच्या अनुभवाच्या बळावर आणि राहुल आवाडे यांच्या सहकार्याने सर्व प्रलंबित प्रश्‍न सोडविले जातील असे सांगितले.
राहुल आवाडे यांनी, वस्त्रनगरी ही कष्टकरी कामगारांची नगरी असून येथील चक्रावरच शहर चालते. वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे त्याला चालना देण्याची गरज आहे. शिवाय पंचगंगा प्रदुषणमुक्त आणि कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना बसणारा महापूराचा फटका कायमस्वरुपी रोखण्याची गरज आहे. ग्रामीण भागात सहकार चळवळीला बळ देण्याची गरज व्यक्त करत संधी मिळाल्यास सर्वसामान्यांच्या हितासाठी विविध योजना राबवू इच्छितो. त्यासाठी सर्वांनी मला विक्रमी मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी मकरंद देशपांडे, धैर्यशील माने,आमदार सौ. शशिकला जोल्ले, महेश जाधव, रघुनाथ कुलकर्णी, रवींद्र माने, राजवर्धन नाईक-निंबाळकर, अशोक स्वामी, प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, प्रा. चंद्रशेखर शहा, उत्तम कांबळे, अमृत भोसले, शहाजी भोसले, स्वप्नील आवाडे, भाऊसो आवळे, विठ्ठलराव डाके, सौ. अश्‍विनी कुबडगे, सौ. उर्मिला गायकवाड, सुनिल पाटील, तानाजी पोवार, मिश्रीलाल जाजू, महेश पाटील, नजमा शेख, वैशाली डोंगरे, अंजली बावणे, अशोक कांबळे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा