इचलकरंजीत सात कोटींच्या रस्ते कामांवर प्रश्नचिन्ह; कार्यादेश दिले तरी कामे पावसाळ्यानंतरच सुरू करावीत – शशांक बावचकर यांची मागणी
इचलकरंजी:
इचलकरंजी महानगरपालिकेने सन २०२४-२५ मध्ये नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना आणि महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत ७५ रस्ते विकास कामांसाठी सुमारे सात कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या होत्या. या निविदांचे दरपत्रक ११ एप्रिल २०२५ रोजी उघडण्यात आले असले, तरी अद्यापही मक्तेदारांना कार्यादेश देण्यात आलेले नाहीत. यामुळे महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.
या संदर्भात माजी नगरसेवक शशांक बावचकर यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्र पाठवून महाराष्ट्र शासनाच्या दिनांक ७ जून २०१६ च्या परिपत्रकाची आठवण करून दिली आहे. या परिपत्रकानुसार, डांबरीकरण व काँक्रीटीकरणाची कामे हवामान लक्षात घेऊन आणि निर्धारित निकषांनुसार मे महिन्याच्या १० तारखेपर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, सध्या इचलकरंजीत मे महिना सुरू झाल्यापासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे अशा कामांची गुणवत्ता धोक्यात येण्याची शक्यता आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे.
“सदर कामांचे कार्यादेश देण्यात आले तरी कामांची सुरुवात ही पावसाळ्यानंतरच करण्यात यावी,” अशी स्पष्ट मागणी बावचकर यांनी आपल्या पत्रात केली आहे. तसेच जर पावसाळ्यात निकृष्ट दर्जाची कामे झाली, तर त्यासाठी महानगरपालिका प्रशासनास जबाबदार धरावे लागेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800