‘माझी वसुंधरा’ अभियानात इचलकरंजीचा दुहेरी सन्मान
इचलकरंजी :
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याचा भव्य समारोप आज मुंबई येथील वरळी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा वारसा जपत शाश्वत विकासाची दिशा देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या सोहळ्यास राज्यपाल आचार्य देवव्रत प्रमुख उपस्थित होते. तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर,उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,सचिव राजेश कुमार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे आणि जयश्री भोज आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
‘माझी वसुंधरा’ अभियान ४.० मध्ये तिसरा क्रमांक आणि ५.० मध्ये दुसरा क्रमांक पटकावत इचलकरंजी महानगरपालिका ने पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली. याबद्दल महानगरपालिकेला सन्मानचिन्ह व पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हा पुरस्कार आमदार डॉ. राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी स्विकारला.
पर्यावरणपूरक उपक्रम, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन, जलसंवर्धन आणि हरित क्षेत्रवाढ या विविध घटकांमध्ये सातत्यपूर्ण व प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेला हा मान मिळाला आहे. शहराच्या पर्यावरणीय प्रगतीसाठी ही गौरवास्पद बाब मानली जात आहे.
पुरस्कार स्वीकारताना आ. डॉ. राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या तसेच अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800









