सकारात्मक बातमीदारीमुळे समाजाचा विकास – डॉ. निलमताई गोऱ्हे.इचलकरंजीत पत्रकार दिन कार्यक्रमात विविध मान्यवरांचा गौरव
इचलकरंजी:
“समाजाच्या चांगल्या जडणघडणीसाठी सकारात्मक बातमीदारी आवश्यक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही पत्रकारांकडून दिले जाणारे योगदान महत्वपूर्ण आहे,” असे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे यांनी केले.
इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल आवाडे होते.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “वृत्तपत्रे न्याय मिळवून देण्याचे माध्यम ठरली आहेत. कोविड काळातही पत्रकारांनी समाजासाठी महत्त्वपूर्ण काम केले.जो दिवस पत्रकारांच्या योगदानासाठी साजरा केला जातो त्या दिवशी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करून श्रमिक पत्रकार संघाने आदर्श निर्माण केला आहे.”
गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमात
रमाकांत वाळवेकर (उद्योग), समीर नाईक (वस्त्रोद्योग), आर्यवर्धन नवाळे (क्रीडा), मारवाडी युवा मंच (सामाजिक), सरोजिनी नायडू विद्यामंदिर (शैक्षणिक) यांचा सन्मान करण्यात आला. शिवछत्रपती पुरस्कार विजेती अश्विनी माळगे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ छायाचित्रकार छोटूसिंग रजपूत यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
आमदार राहुल आवाडे यांनी पत्रकारितेच्या आधुनिक बदलांचे कौतुक करत पत्रकारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर
माजी आमदार सुरेश हाळवणकर,माजी मंत्री प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे,प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची उपस्थिती होती.सुरुवातीला मनीष आपटे यांच्या ‘मन के गीत’ सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहित शिंगे आणि सनोफर नायकवडी यांनी केले, तर आभार बसवराज कोटगी यांनी मानले. विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी प्रश्न आणि जीएसटी परताव्याचे आश्वासन,पत्रकारांच्या मागण्यासाठी बैठक-
शहराचे दूषित पाणी होत असल्याच्या बातम्या वारंवार वाचनात येतात त्याबाबत मार्ग काढला जाईल, तसेच इचलकरंजी महापालिकेला जीएसटीचा परतावा तत्काळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,तसेच पत्रकारांच्या मागण्यांसाठी माजी आ.आवाडे हाळवणकर यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधीसह बैठक लावण्यात येईल असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
भाजपने सर्वाना सोबत घ्यावे-गोऱ्हे
आ.राहुल आवाडेंच्या विजयात महायुतीचे योगदान असल्याने आ.राहुल आवाडेनी भविष्यात सर्वांचा विचार करून निर्णय घ्यावेत व स्थिर रहावे असा भाषणात उल्लेख केल्याने महापालिका निवडणुकीत भाजपच्या स्वबळाच्या विचारांवर त्यांनी भाष्य केले असण्याची शक्यता उपस्थितातून झाली
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







