शक्तीपीठ महामार्गासाठी बाधितांचे प्रश्न सोडवून प्रकल्पाला गती देण्याची मागणी-व्हिजन इचलकरंजीचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन
इचलकरंजी
पश्चिम महाराष्ट्राला प्रगत व औद्योगिक दृष्टिकोनातून पुढे नेण्यासाठी उत्तम दळणवळण साधनांची गरज आहे. या पार्श्वभूमीवर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा संपूर्ण भागासाठी विकासाचे द्वार उघडणारा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे. मात्र महामार्ग बाधितांना योग्य मोबदला मिळावा आणि त्यांचे प्रश्न सोडवून प्रकल्पाला गती मिळावी, अशी मागणी ‘व्हिजन इचलकरंजी’ या संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महामार्गामुळे कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात व्यापार, उद्योग, व व्यवसायासाठी मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. महामार्गात जमिनी गेलेल्या बाधितांच्या उर्वरित जमिनींचे दर वाढणे, महामार्गालगत उर्वरीत जमिनीत बाधितांनाच नव्या व्यावसायिक संधी निर्माण होऊन प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. शेजारील सांगली जिल्ह्यातून पुणे-बेंगळूर द्रुतगती मार्ग जात असून कोल्हापूर जिल्हा या नव्या स्पर्धेत मागे राहू नये म्हणून नवीन महामार्गाची व उत्तम दळणवळणाची आवश्यकता निर्माण झाली आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्ग बाधितांना योग्य मोबदला देण्याची मागणी करण्यात आली आहे. यामुळे बाधितांना होणाऱ्या आर्थिक संभाव्य विकासाचे महत्त्व पटवून देता येईल. बाधितांची समजूत काढून प्रकल्पास सहकार्य करण्याचे आवाहनही संस्थेने केले आहे.
देशभरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते विकासाचे जाळे निर्माण होत असताना कोल्हापूरसारखा महत्त्वाचा जिल्हा मागे राहू नये यासाठी या महामार्ग प्रकल्पाला प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे ‘व्हिजन इचलकरंजी’ने म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन प्रकल्पाला गती द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष कौशिक मराठे आदींसह अन्य सदस्य उपस्थित होते.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800