वस्त्रोद्योगाच्या अडचणींकडे केंद्राने लक्ष द्यावे; अशोकराव स्वामी यांची केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर, ता. २ :
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष अशोकराव स्वामी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासमोरील गंभीर प्रश्न मांडले. राजस्थानातील पाली, जोधपूर व बालोतरा येथील प्रोसेस उद्योग बंद असल्यामुळे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग संकटात सापडला असून, केंद्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून ४ ऑगस्टच्या उच्च न्यायालयीन सुनावणीत प्रतिज्ञापत्र दाखल करावे, अशी मागणी करण्यात आली.
महासंघाने ‘टफ (TUFS)’ योजनेचा लाभ केवळ शटललेस यंत्रमागापुरता मर्यादित न ठेवता साध्या पॉवरलूमसह वस्त्रोद्योगातील सर्व घटकांना लागू करावे, तसेच सीसीआयमार्फत महाराष्ट्रातील सूतगिरण्यांना अनुदानित दरात कापूस उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. राजस्थानातील प्रोसेस उद्योग बंद असल्याने इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव व विटा येथील उद्योगांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून अनेक पॉवरलूम कारखाने अडचणीत आल्याचे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेत लवकरच नवी दिल्ली येथे उद्योग प्रतिनिधी व मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी, महासंघाचे संचालक व माजी नगरसेवक दिलीप मुथा, महेश सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन उल्हास सूर्यवंशी यांच्यासह वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनेक उद्योजक व प्रतिनिधी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्याशी चर्चा करताना अशोक स्वामी व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







