ICHMH51NEWS.IN
9921600800

जेन झी ( Gen Z ) च्या एल्गाराने मनमानीचा फुगा फोडला आहे  ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचे मत 

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जेन झी ( Gen Z ) च्या एल्गाराने मनमानीचा फुगा फोडला आहे 

ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांचे मत 

इचलकरंजी ता. ३
शहीद भगतसिंग यांचा क्रांतिविचार , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वांगीण समतेचा आग्रह,महात्मा गांधींच्या सत्याग्रह आणि भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञान या वैचारिक पायावर नव्या पिढीने आंदोलन हातात घेतले. त्यांचा झालेला उद्रेक हा उत्स्फूर्त होता. कॉक्रोच  पार्टीची स्थापना, सोनम वांगचुक यांचे उपोषण आणि आइसाच्या अध्यक्ष नेहा बोरा यांची सत्याग्रही कणखर भूमिका यामुळे हे आंदोलन सोशल मीडिया वरून रस्त्यावर यायला फार वेळ लागला नाही. आणि त्यातूनच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला लागला. सत्ताधाऱ्यांच्या मनमानीच्या आणि दहशतीचा फुगा विद्यार्थ्यांनी फोडलेला आहे.जेन झी ( Gen Z ) एल्गारातून भारतीय राजकारण बदलाच्या दिशेने जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत ,असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉ. विजय चोरमारे यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने  ” जेन झी ( Gen Z )चा एल्गार “या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार राजू शेट्टी होते. समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक चौसाळकर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
डॉ. विजय चोरमारे पुढे म्हणाले, या आंदोलनाच्या भूमिकेला नैतिक अधिष्ठान होते. परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहारामुळे वीसहून अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे दाहक वास्तव होत्ते . आपण सर्व काही मॅनेज करू शकतो अशा भ्रमात असलेल्या सत्ताधाऱ्यांना हे आंदोलन मॅनेज करणे अशक्य होते. कारण संसदेतली बहुमताची लढाई आणि रस्त्यावरची लढे हे वेगवेगळे असतात. दुर्लक्ष करून अथवा हिंसक वळण देऊन आंदोलन मोडून काढू पाडणाऱ्यांना विद्यार्थ्यांनी भिक घातली नाही. ही मुले गुंडाळली गेली नाहीत .लाठ्या काठ्या खाऊनही ती मूळ मागणी पासून हटली नाहीत याचे महत्त्व फार मोठे आहे. तसेच या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांनी ज्या पद्धतीने अखेरच्या टप्प्यात पाठिंबा दिला ती रणनीतीही फार अर्थपूर्ण ठरली.स्वतंत्र भारताच्या इतिहासात पंतप्रधानांच्या दारात विरोधी पक्षनेता जाब विचारण्यासाठी उभा ठाकतो. तसेच इतकी मोठी घडामोड देशाच्या राजधानीत होत असताना संसदेच्या अधिवेशनाला पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात उपस्थितच राहत नाहीत हेही देशाने पहिल्यांदाच पाहिले. शिक्षणासंदर्भात सुरू झालेले हे आंदोलन आता मोठ्या व्याप्तीमध्ये रूपांतरित होताना दिसते आहे. संसदेततील बहुमत टिकवताना रस्त्यावरचे बहुमत मिळवण्यात सत्ताधीश अपयशी ठरत आहेत. समाजाच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक न करता सत्ता कायम ठेवण्यासाठी सत्तेचा प्रचंड गैरवापर होतो आहे.
श्रीराम मंदिरातील पैशांच्या चोरीपासून अनेक गैरव्यवहार आणि इतरही बाबतीत येणारे अपयश यामुळे सरकार मुळात पिछाडीवर गेलेले आहे. त्यात  जेन झी चे नवी भाषा,नवा विचार, नवा मार्ग शोधणारे आंदोलन म्हणजे एल्गार आहे असे म्हणावे लागेल. डॉ.विजय चोरमारे यांनी या विषयाची तपशीलवार मांडणी केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, मी या आंदोलनात तीन दिवस प्रत्यक्ष सहभागी झालो होतो. जेन झी ची मुले मुली कमालीची निर्भय दिसत होती.हे सरकार भित्रे आणि भेकड आहे हे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. आपल्या न्याय्य मागणीसाठी सर्वसामान्य हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेले हे आंदोलन गेल्या दहा-बारा वर्षातील राजकीय नैराश्य झटकणारे आणि सत्तेचा दहशतवाद मोडून काढणारे आहे. आता हे आंदोलन निवडणूक जिंकण्यासाठी मोठा गैरवापर होणाऱ्या ईव्हीएम हटाव पर्यंत नेण्याची गरज आहे. नव्या पिढीतील तरुण आणि सर्वसामान्य माणसे सत्तेचा माज उतरवू शकतात हे या आंदोलनातून सिद्ध झालेले आहे. या व्याख्यानास विविध क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
मनोगत व्यक्त करताना विजय चोरमारे, व्यासपीठावर अशोक चौसाळकर, माजी खासदार राजु शेट्टी,प्रसाद कुलकर्णी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा