महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रित जनतेसमोर जाणे गरजेचे- खा.धैर्यशील माने यांचे संगानियो मेळाव्यात प्रतिपाद

महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रित जनतेसमोर जाणे गरजेचे- खा.धैर्यशील माने यांचे संगानियो मेळाव्यात प्रतिपादन
इचलकरंजी
गरजवंतांच्या पाठीशी सरकार उभे राहत आहे.विविध योजनांच्या माध्यमातून सर्व घटकांना प्रोत्साहन व पाठबळ दिले जात असून ही पिढी सक्षम व्हावी,महिलांनी आत्मनिर्भर व्हावे देशाला वेगळ्या उंचीवर नेत असताना महाराष्ट्र त्याचा कणा म्हणून कायमपणे पुढे राहावा, यासाठी असे प्रकल्प आदर्शवत म्हणून देशासमोर पुढे राहतील, असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी येथे केले.संजय गांधी निराधार योजनेच्या २१३८ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
खासदार माने म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ३००० रुपये अनुदान देण्याबाबतची मागणी यापूर्वी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. याचा पाठपुरावा केला तर शासन आता देण्याच्या मानसिकतेत आहे, आपण मागायला कमी पडायला नको. आचारसंहितेच्या आधी या योजनेला बळकटी मिळाली तर ज्येष्ठ,महिला, दिव्यांगांचे कायमस्वरूपी आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतील व हा महत्त्वाकांक्षी निर्णय होईल. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम मिळाल्यानंतर अनेक महिलांनी सोशल मिडियावर आनंद व्यक्त करणारे स्टेटस ठेवले आहेत. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्वांना मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर अशोक स्वामी,विठ्ठल चोपडे,रवींद्र माने,राहुल आवाडे, प्रकाश दतवाडे,हिंदुराव शेळके,अमृत भोसले,प्रसाद खोबरे,मिश्रीलाल जाजू,भाऊसो आवळे,अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने यांच्यासह संजय गांधी निराधार योजनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.
आमदार प्रकाश आवाडे यांनी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अडीच लाखांची उत्पन्न मर्यादा आहे. पण,संजय गांधी निराधार योजनेसाठी उत्पन्न मर्यादा २१, ०००रुपये असल्याची खंत व्यक्त करत त्यांनाही अडीच लाख उत्पन्न मर्यादा असावी असा ठराव मांडा व त्यानुसार पाठपुरावा करूया असे मत व्यक्त केले.
संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांनी प्रास्ताविकात संगांनियोच्या अध्यक्ष म्हणून निवड झाल्यापासून मी पक्षाचे पद घेतले नाही.कारण या पदाला न्याय द्यायचा होता, सर्वसामान्य व गोरगरिबांची सेवा करायची आहे, याचा आनंद कोणत्याही पदापेक्षा मोठे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पेन्शनची रक्कम ३००० रुपये करावी,उत्पन्न दाखल्यासाठी २१ हजाराची अट वाढवावी, स्वतंत्र संगांयो नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी,कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी नेमावा,दिव्यांग दाखल्यासाठी आयजीएम रुग्णालयात व्यवस्था करावी आदी मागण्या खासदार माने यांच्याकडे मांडल्या.
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी आयजीएम रुग्णालयमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांना अधिकार दिल्यास दिव्यांग दाखल्याबाबतचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागेल, यासाठी सामुदायिक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगत ६५ वयावरील ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन केले.
सूत्रसंचालन सतीश पंडित व प्रदीप मळगे यांनी केले यावेळी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारच्या घटक पक्षात समन्वय असावा- खा.माने
गेल्या आठवड्यात खासदार माने आवाडे यांच्या चालकात झालेल्या हाणामारीचा मुद्द्याला हात घालत खासदार धैर्यशील माने यांनी नेते लगेच जुळवून घेतात पण कार्यकर्त्यांचे जुळणे अवघड असते,महायुती सरकार चांगल्या योजना राबवत असून त्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे जनतेसमोर मांडणे आवश्यक असल्याचे नमूद केले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800