स्वच्छ इचलकरंजीसाठी कालबद्ध कृती आराखडा; २० जूनपासून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी
इचलकरंजी, दि. ५ :
घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इचलकरंजी महानगरपालिकेची विशेष सभा शुक्रवारी महापौर उदय धातूंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाबाबत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
उपायुक्त विद्या कदम यांनी घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पुढील एक वर्ष, दोन वर्षे आणि तीन वर्षांसाठी कालबद्ध कृती आराखडा सभागृहासमोर सादर केला. या आराखड्यात कचरा वर्गीकरण, संकलन, प्रक्रिया व वैज्ञानिक विल्हेवाट याबाबत टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्वच्छ इचलकरंजी ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाच्या मनात स्वच्छतेची भावना रुजली पाहिजे, असे सांगितले. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सभेत नगरसेवक रवी रजपूते, तानाजी पोवार, मदन कारंडे, ध्रुवती दळवाई, अभिषेक वाळवेकर, अलका स्वामी, सचिन राणे, अमरजीत जाधव, उदयसिंग पाटील आणि विठ्ठल चोपडे यांनी विविध सूचना मांडल्या. त्यानंतर अनिल डाळ्या यांनी इंदोर पॅटर्नच्या धर्तीवर स्वच्छता अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.
महापौर उदय धातूंडे यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेस सहकार्य केल्याबद्दल सर्व नगरसेवकांचे आभार मानले. तसेच शहरात २० जूनपासून प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून लवकरच नव्या कंपनीकडे कचरा संकलनाचे काम सोपविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक इचलकरंजी घडविण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




