इचलकरंजी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार-शशांक बावचकर
इचलकरंजी:
शहरातील विकासकामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्यामुळे महानगरपालिकेची भूमिका गौण झाली आहे. त्यामुळे इचलकरंजी महानगरपालिकेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चालवण्यासाठी देण्यात यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस शशांक बावचकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे करण्याचे संकेत दिले आहेत.
शहरात सध्या सुरू असलेली ५२ कोटी रुपयांच्या रस्ते डांबरीकरणाची कामे,१५ कोटींच्या जलकुंभ उभारणीची योजना, तसेच ८ कोटींच्या नाट्यगृहाच्या नूतनीकरणाची कामे महानगरपालिकेऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली आहेत. ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महानगरपालिकेचे या कामांवर कोणतेही नियंत्रण नसून,ती केवळ निधी मंजुरीसाठी किंवा ना हरकत दाखल्यासाठी मर्यादित राहिली आहे. शशांक बावचकर यांनी यावर नाराजी व्यक्त करत, “महानगरपालिकेचे अस्तित्वच संपवण्याचे काम सुरू आहे,”असा आरोप केला आहे.
१९९३ साली ७३ वी आणि ७४ वी घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक स्वायत्तता मिळाली होती. मात्र, इचलकरंजीत ही स्वायत्तता गमावली जात असून, विकासकामांचे नियोजन आणि अंमलबजावणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिल्यामुळे महानगरपालिका अप्रासंगिक बनत आहे.
सन २०१५-१६ मध्ये तत्कालीन भाजप आमदारांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामे वर्ग केली होती. त्यावेळी माजी आ.प्रकाश आवाडे काँग्रेस मध्ये असताना त्यांनी विरोधाची भूमिका घेतली होती.आता सत्तेत आल्यावर त्याच निर्णयाची पाठराखण केली आहे. त्यामुळे या कामांवर सत्तेचे आणि आर्थिक केंद्रीकरण करून एक खिडकी योजना राबवण्याचा हेतू आहे का, असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800