समाजातील मतभेद विसरून एकत्र येणे काळाची गरज-डॉ स्वामी सेवानंद महाराज
इचलकरंजी –
समाजातील मतभेद विसरून एकत्र येणे हीच काळाची गरज आहे, असे प्रतिपादन डॉ. स्वामी सेवानंद महाराज यांनी येथे केले. येथील सकल हिंदू समाजाच्यावतीने गावभागातील महाराणा प्रताप चौक येथे आयोजित विशाल हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी ते बोलत होते.
महाराज म्हणाले, समाजातील ऐक्य टिकवण्यासाठी अशा संमेलनांची आवश्यकता असून, सर्वांनी एकाच छताखाली येत राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी उमेश जाधव यांनी मुद्देसूद विचार मांडत नागरिकांनी जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले. अर्चना रानडे यांनी कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत कुटुंब टिकले तर राष्ट्र टिकते, असे सांगितले. महिलांनी सक्षम होऊन समाजघडणीत सक्रिय भूमिका बजावावी, असे त्यांनी नमूद केले.
तर अक्षय खांडेकर यांनी, पंचपरिवर्तनाच्या संकल्पनेवर भाष्य करत कायद्याचे पालन, शिस्त आणि एकात्मता यांची गरज अधोरेखित केली. लहानसहान कामांसाठी नेत्यांवर अवलंबून न राहता नागरिकांनी स्वतः पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन योगेश जेरे यांनी केले. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेली शिवकालीन वेशभूषा व दांडपट्टा-लाठीकाठीची प्रात्यक्षिके हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. प्रशांत कुलकर्णी यांनी आभार मानले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







