परमपूज्य आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांच्या यम सल्लेखनेचा आठवा दिवस; भक्तांची कुंथलगिरी येथे मोठी गर्दी
इचलकरंजी / प्रतिनिधी
परमपूज्य आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज यांच्या यम सल्लेखना साधनेचा आज आठवा दिवस असून महाराष्ट्रातील सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे देशभरातील जैन समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. आचार्य श्रींनी २३ जून २०२६ रोजी यम सल्लेखना जाहीर केली होती.
शांत, संयमी आणि तपस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले आचार्य श्री वर्धमान सागरजी महाराज हे परमपूज्य १०८ संमतीसागरजी महाराज यांचे परमशिष्य आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव पायगोंडा पाटील असून त्यांचा जन्म ३ जानेवारी १९५१ रोजी निमशिरगाव येथे झाला. त्यांनी बी.एस्सी., बी.एड. शिक्षण पूर्ण करून इचलकरंजीतील शहापूर परिसरातील राजीव गांधी विद्यामंदिर येथे शिक्षक म्हणून कार्य केले व हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले.
सन २००४ मध्ये इचलकरंजी येथे त्यांचा दीक्षा महोत्सव सोहळा पार पडला होता. त्यानंतर त्यांनी जैन धर्माचा प्रचार-प्रसार, संयम, तप, त्याग आणि वैराग्याचा संदेश विविध भागांत पोहोचवला. महाराष्ट्रासह देशातील अनेक शहरांमध्ये त्यांच्या सहसंघाचे चातुर्मास झाले आहेत.
आचार्य श्रींनी बांबोडे येथे भव्य तीर्थक्षेत्र उभारण्यासाठी योगदान दिले. तसेच आपल्या संघातील परमपूज्य १०८ विद्यासागरजी महाराज यांच्याकडे आचार्यपदाची जबाबदारी सोपवल्याचे सांगितले जाते.
सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे सुरू असलेल्या यम सल्लेखना काळात भाविक आचार्य श्रींचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करत असून त्यांच्या संयम, तप, त्याग व वैराग्यपूर्ण जीवनातून प्रेरणा घेत आहेत. आचार्य श्रींची सल्लेखना व समाधी निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी, अशी प्रार्थना भाविकांकडून व्यक्त केली जात आहे.
– अनिल बम्मन्नावर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






