राणीबाग खाऊगल्ली परिसरातील विक्रेत्यांना इचलकरंजी महानगरपालिकेकडून स्वच्छतेबाबत नोटीस
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छ सर्वेक्षण ५.० आणि माझी वसुंधरा २०२५ अंतर्गत “कचरा मुक्त शहर” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता निरीक्षण मोहीम सुरू आहे.
या मोहिमेदरम्यान वार्ड क्र. १२, राणीबाग खाऊगल्ली परिसरातील काही खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचे आढळून आले. सदर बाब लक्षात घेऊन इचलकरंजी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने संबंधित विक्रेत्यांना नोटीस देऊन इशारा दिला आहे.
Advt
नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, “रस्त्यावर अनावश्यक कचरा टाकणे ही आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाब असून, अशा प्रकारचे गैरवर्तन पुन्हा आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच त्यांना सदर ठिकाणी बसण्याची परवानगी रद्द करण्याची कार्यवाही प्रस्तावित होईल.”
ही कारवाई स्वच्छता निरीक्षक करण लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, वॉर्ड इन्स्पेक्टर रोहन भोसले, मुकादम महादेव धनवडे आणि सफाई कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
महानगरपालिकेने सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांना आवाहन केले आहे की, शहर स्वच्छ आणि हरित ठेवण्यासाठी आपला कचरा योग्य ठिकाणीच टाकावा आणि स्वच्छतेस हातभार लावावा.
नोटीस बजावताना करण लाखे,महादेव धनवडे,रोहन भोसले
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







