सामान्य मुलांना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण प्रवाहात आणले- देवदत्त कुंभार
इचलकरंजी ता.२२ ग्रामीण भागातील अठरापगड जातीच्या, दीनदलित मुलांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे क्रांतिकारी काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले .स्वावलंबी शिक्षणातून श्रमनिष्ठेची जोपासना करत रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊरावांनी विद्यार्थ्यांचा स्वाभिमान जागृत केला. असे मत समाजवादी प्रबोधिनीचे कार्यकर्ते व तरुण शिक्षक अभ्यासक देवदत्त कुंभार यांनी व्यक्त केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात बोलत होते. अध्यक्षस्थानी सचिन पाटोळे होते. स्वागत व प्रास्ताविक अन्वर पटेल यांनी केले.
देवदत्त कुंभार पुढे म्हणाले,वसतिगृह युक्त शिक्षण हा भाऊरावांच्या शिक्षण पद्धतीचा कणा होता. वसतीगृहातील सर्व विद्यार्थ्यांवर सहजीवन, सहभोजन आणि सहशिक्षणाचा संस्कार करत कर्मवीर अण्णांनी जातीभेदाच्या भिंती पाडून मानवतेचे मनोरे उभे केले होते.कर्मवीरांच्या दूरदृष्टीतून, परिश्रमातून आणि लक्ष्मीबाईंच्या त्यागातून रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले होते.महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी यासारख्या महामानवांच्या विचाराचे आणि कार्याचे सार कर्मवीर भाऊरावांच्या शिक्षण प्रणालीत पाहायला मिळते.
बेरोजगारी ,आर्थिक व सामाजिक विषमता, जात आणि धर्माचा दुराभिमान, पर्यावरणीय समस्या, वाढत्या चंगळवाद, युवकांमधील नैराश्य इत्यादी अनेक प्रश्नांना भाऊरावांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान हेच उत्तर आहे. यावेळी प्रसाद कुलकर्णी, प्रा . रमेश लवटे,तुकाराम अपराध,अशोक केसरकर, राजन मुठाणे, रामचंद्र ठिकणे, शंकर कोरे, शकील मुल्ला ,शहाजी धस्ते, मनोहर जोशी आदी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







