सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी निवारागृह करा-शशांक बावचकर
इचलकरंजी –
शहरात वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक, लहान मुले व वृद्धांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची महानगरपालिकेकडून तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
Advt

निवेदनात त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणांमधून भटक्या कुत्र्यांना तातडीने हटवून त्यांच्यासाठी स्वतंत्र निवारागृह उभारण्याचे आदेश दिले आहेत. शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस व रेल्वे स्थानके, क्रीडा संकुले याठिकाणांहून कुत्र्यांना हलवून त्यांची नसबंदी व लसीकरण करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले असून पकडलेल्या कुत्र्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडू नये असेही स्पष्ट केले आहे.
राज्य सरकारनेही संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्याची नोंद बावचकर यांनी केली. इचलकरंजी महानगरपालिकेने याबाबत अद्याप कोणती ठोस पावले उचलली नाहीत, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे त्वरित पालन करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







