साखर उद्योगाच्या शाश्वत भविष्यासाठी राष्ट्रीय कार्यशाळा कोल्हापूरमध्ये संपन्न
कोल्हापूर –
भारतीय शुगर, पुणे यांच्या वतीने “साखर उद्योगाचा शाश्वत, हरित व उत्पादनक्षम भविष्यासाठी प्रवास (समस्या व उपाय)” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा रेसिडेन्सी क्लब, कोल्हापूर येथे पार पडली. सहकारी व खाजगी साखर कारखान्यांचे पदाधिकारी, तांत्रिक अधिकारी, सल्लागार व मशिनरी उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यशाळेचे उद्घाटन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी साखर उद्योगासमोरील चढ-उतार, हवामानातील अनिश्चितता या आव्हानांचा उल्लेख करून, उपपदार्थ निर्मिती, आधुनिकीकरण, ऑटोमायझेशन व कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर हे उद्योगासाठी अपरिहार्य असल्याचे सांगितले. मर्यादित ऊसक्षेत्रात अधिक उत्पादन घेण्यासाठी एआयचा वापर महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी नमूद केले. तसेच दीर्घकालीन सरकारी धोरणाची स्पष्टता व शेतकरी-उद्योग यांचा परस्पर लाभ यावर भर दिला.
तांत्रिक सत्रांमध्ये सीबीजी निर्मिती, झिरो लिक्विड डिस्चार्ज, ऊस बायोमासचा वापर, इथेनॉल उत्पादन व ऊर्जा संवर्धन यावर सविस्तर चर्चा झाली. कंपन्यांनी नवीन मशिनरी सादर केली तर तज्ञांनी कार्यक्षमतेसाठी व्यावहारिक उपाय सुचविले.
कार्यशाळेत विक्रमसिंह शिंदे (अध्यक्ष, भारतीय शुगर), संग्रामसिंह शिंदे (सीईओ) तसेच समिती सदस्य उपस्थित होते. या चर्चेमुळे शाश्वततेकडे नवी दिशा मिळेल व शेतकरी-उद्योग दोघांचेही हित साधले जाईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यशाळेत बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







