भारतीय संविधान हा केवळ कायदा नव्हे तर बदलत्या काळातील जिवंत दस्तावेज- डॉ. श्रीपाल सबनीस
इचलकरंजी
भारताचे संविधान हा केवळ कायदा नव्हे तर बदलत्या काळातील एका अतिशय महत्त्वाचा असा जिवंत दस्तावेज आहे. भारताचे नियमन आणि जडणघडण या संविधानाच्या चौकटीतून होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भारतीय संविधान आणि आजची प्रस्तुतता या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिलावर जमादार होते.यावेळी बोलताना सबनीस पुढे म्हणाले की, भारतीय संविधानाकडे पाहत असताना केवळ शोषित वंचितांचा कैवार घेणारे एक कागदपत्र म्हणून पाहिले जाते, मात्र भारतीय संविधानाची भूमिका केवळ तितकीच मर्यादित नसून सामाजिक न्याय बंधुता आणि भारताची एकूणच नव्या कालखंडाप्रमाणे बांधणी करण्याचे श्रेय केवळ संविधानात आहे त्यामुळे भारतीय संविधानाचा शाळा महाविद्यालयांपासून अभ्यासक्रमांमध्ये समावेश होणे आणि प्रत्येक सुजाण नागरिकांनी त्याचा अंगीकार करणे ही येणाऱ्या काळाची गरज आहे असे ते म्हणाले.
दुसऱ्या सत्रामध्ये दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रा. मिलिंद आव्हाड यांनी भारतीय संविधानाचा अभ्यास आजच्या संदर्भामध्ये अकॅडमी पातळीवर वेगवेगळ्या अनुषंगाने होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
परभणी येथील डॉ. सुरेश शेळके यांनी भारतीय संविधान हा फक्त कायद्याचा ग्रंथ नसून अठरा पगड जातींना आणि भारतातल्या वेगवेगळ्या भाषा समुहाना एकत्र करणारे महत्त्वाचे साधन आहे असे मत मांडले.
निर्मिती प्रकाशनचे अनिल म्हमाणे यांनी प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींच्या सहभागातून संविधान घराघरात पोहचवू असे आवाहन केले.
यावेळी उद्घाटनाच्या सत्रात संस्थेचे अध्यक्ष संजय दादा आवळे, प्रशासन अधिकारी संजय भोरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला.
समारोपाच्या सत्रात अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. उज्ज्वला पाटील यांनी दिवसभराच्या शोध निबंध सादरीकरणाचा आढावा घेतला.
स्वागत प्रास्ताविक डॉ. कपिल राजहंस यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. वसंत भागवत यांनी करून दिला, आभार डॉ. मोहन जोशी यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. वैजयंता कदम पाटील, डॉ. वैशाली चौगुले यांनी केले. यावेळी प्राध्यापक, शासकीय अधिकारी, विद्यार्थी, संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








