कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्याचा ३३ वा हंगाम समाप्त
इचलकरंजी –
हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२५-२६ हा ३३ वा ऊस गाळप हंगाम संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि ज्येष्ठ संचालक प्रकाश आवाडे आणि संचालक आमदार राहूल आवाडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे संपन्न झाला. हंगाम समाप्तीप्रित्यर्थ व्हाईस चेअरमन बाबासाो चौगुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सन्मती चौगुले या उभयतांच्या हस्ते श्री सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. त्याचबरोबर हंगामात उत्पादित झालेल्या साखर पोत्यांचे पूजनही करण्यात आले.
कारखान्याच्या या गाळप हंगामामध्ये १४ लाख ८९ हजार ७२२ मे. टन इतके ऊस गाळप केले. या हंगामात कारखान्याकडे १६४२४ हेक्टर इतका ऊस गाळपासाठी आला. हंगामापूर्वीचा सततचा पाऊस व अपुऱ्या सूर्यप्रकाशामुळे ऊस पिकाच्या वजन वाढीवर दुष्परिणाम झाला. अर्थातच हवामानाच्या या प्रतिकुलतेमुळे ऊसाच्या वजनात घट झाली. त्यामुळे चालू हंगामामध्ये हेक्टरी सरासरी ९१ मे. टन इतके ऊस उत्पादन मिळाले, मागील हंगामात ते ९६ मे.टन होते. गाळप हंगाम २०२५-२६ करीता ऊस विकास योजनेतून खते, बि-बियाणे, तणनाशके, सुक्ष्म अन्नद्रव्ये, ठिबक सिंचन, क्षारपड जमीन सुधारणा यासाठी १६ कोटी ०८ लाख १८ हजार इतक्या रकमेचे वाटप केले. त्यामध्ये ९६ लाख ५९ हजार इतके अनुदान दिलेले आहे.
या हंगामाकरीता तोडणी वाहतूकीसाठी २ ट्रक, ३११ ट्रॅक्टर, ४५९ ट्रॅक्टर टायरगाडी व २१६ बैलगाडी आणि ६६ ऊस तोडणी यंत्रे प्रत्यक्षात कामावर हजर झाले. यामुळे हंगामात सलग ऊस पुरवठा होण्यास मदत झाली.
ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे गाळपास पाठवून सहकार्य केल्याबद्दल शेतकरी-सभासद, तोडणी वाहतूकदार व मजूर आणि अधिकारी-कर्मचारी कामगार यांचे कारखाना व्यवस्थापनाने आभार मानले. पुढील हंगामामध्ये या वर्षापेक्षाहि अधिक ऊस गाळप होण्यासाठी सर्व सभासद व शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस नोंद देऊन गाळपासाठी पाठवावा असे आवाहनही संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे संचालक, कामगार युनियनचे प्रतिनिधी तसेच इतर मान्यवर व कारखान्याचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







