प्रोसेस सुरू झाल्यास इचलकरंजीचा पाणीपुरवठा ठप्प करण्याचा आंदोलन अंकुशचा इशारा
इचलकरंजी :
पंचगंगा नदीत प्रक्रिया केलेले सांडपाणी सोडण्याच्या प्रकारावरून वातावरण तापले असून आंदोलन अंकुश संघटनेने प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. “प्रोसेस युनिट्स तात्काळ बंद करा, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देता बंद करू,” असा आक्रमक पवित्रा संघटनेने घेतला आहे.
संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सीईटीपी प्रकल्पातून प्रक्रिया झालेले पाणी शेतीसाठी वापरले जात असल्याचा दावा खोटा ठरला आहे. ३० एप्रिल रोजी झालेल्या पाहणीत हे पाणी थेट ओढ्याद्वारे पंचगंगा नदीत सोडले जात असल्याचे उघड झाले. याबाबत अधिकृत नोंदी करून संबंधितांच्या सह्या देखील घेण्यात आल्या आहेत.
तरीही २ मे रोजी झालेल्या बैठकीनंतर प्रोसेस सुरू ठेवण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. “पर्यायी व्यवस्था होईपर्यंत एकही युनिट सुरू होता कामा नये,” असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
पंचगंगा प्रदूषणमुक्ती समितीची परवानगी न घेता प्रोसेस सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देत मजरेवाडी येथून होणार शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इरादा संघटनेने स्पष्ट केला आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




