रक्षाकुंड विषयावर ‘दीपस्तंभ युवा मंच’चा प्रशासनावर जोरदार हल्ला — निष्क्रियतेमुळे संस्था आक्रमक
इचलकरंजी :
शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी ‘दीपस्तंभ युवा मंच’ने २०१६ साली स्वखर्चातून रक्षाकुंड उभारून एक आदर्श उपक्रम राबवला होता. “एक मूठ रक्षा श्रद्धेसाठी नदीत विसर्जन — बाकी रक्षा पर्यावरणासाठी” असा जनजागृतीचा संदेश देत हा उपक्रम गेली आठ वर्षे प्रभावीपणे सुरू होता. मात्र, कुंड खराब झाल्यानंतर अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
शेवटी तत्कालीन उपायुक्त स्मृति पाटील मॅडम यांनी स्वतः पुढाकार घेऊन नव्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे रक्षाकुंड बांधून दिले. पण आजही या ठिकाणी कर्तव्यदक्ष कर्मचारी न नेमल्याने देखभाल आणि व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या विषयावर वारंवार टाळाटाळ होत असल्याने ‘दीपस्तंभ युवा मंच’चे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “शहराचा उपक्रम, पर्यावरणाचे रक्षण आणि जनजागृती — या सर्व गोष्टींकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संस्थांना आक्रमक होण्याची वेळ आली आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया मंचकडून देण्यात आली.
लवकरात लवकर जबाबदार कर्मचारी नेमून रक्षाकुंडाचे व्यवस्थित व्यवस्थापन न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संस्थेने दिला आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








