इचलकरंजीतील प्रदूषित पाण्याचा प्रश्न १५ महिन्यांत टप्प्याटप्प्याने मार्गी.
माजी मंत्री प्रकाश आवाडे ; CETP बैठकीत ठोस निर्णय
इचलकरंजी :
शहरातील प्रदूषित पाण्याचा प्रश्न येत्या पंधरा महिन्यांत टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचा निर्धार संबंधित यंत्रणांच्या बैठकीत करण्यात आला. इचलकरंजी टेक्सटाईल CETP येथे झालेल्या बैठकीत याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बैठकीच्या प्रस्ताविकात अजित टारे यांनी सांगितले की, २००२ मध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्या कार्यकाळात CETP साठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. २०१२ पासून हा प्रकल्प कार्यान्वित असून दररोज सुमारे १२ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते शेतीसाठी दिले जाते.
संदीप मोघे यांनी सांगितले की, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात येत आहेत. जवाहर सहकारी साखर कारखाना, हुपरी यांच्या माध्यमातून निमशिरगाव येथील धडक योजनेद्वारे प्रक्रिया केलेले पाणी उचलण्यास मान्यता देण्यात आली असून, पुढील तीन महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. यामुळे तारदाळ, खोतवाडी, निमशिरगाव परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
यावेळी बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी प्रोसेसधारकांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. त्यांनी सांगितले की २०१२ मध्ये उद्योगांच्या मागणीनुसार CETP प्रकल्प उभारण्यात आला होता; मात्र त्या वेळी सांडपाण्याचे प्रमाण कमी दाखवण्यात आल्याने सध्या पाण्याचा ताण वाढला आहे. सध्या १० लाख लिटर साठवण क्षमता असून आणखी १० लाख लिटरची टाकी उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले.
तसेच, धडक योजनेसाठी लागणाऱ्या पाइपलाइनचा खर्च संबंधित उद्योगांनी स्वतः करावा, पाणी घेणे व सोडणे यासाठी मीटर बसवावेत, तसेच कोणत्याही प्रकारचे रासायनिक पाणी विनाप्रक्रिया सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. “एका उद्योजकाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण उद्योगाला बदनामी सहन करावी लागू नये,” असा इशाराही त्यांनी दिला.
अध्यक्ष गिरीराज मोहता यांनी सांगितले की, इचलकरंजीतील प्रोसेस उद्योग नेहमीच जबाबदारीने वागले आहेत. गेल्या अनेक वर्षांत न झालेली कामे आता पूर्णत्वास जात असून, शहरातील पाणी प्रदूषण रोखण्यासाठी १०० टक्के उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विविध ठिकाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारले जात असून, सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस विजय आवटी, श्रीनिवास बोहरा यांच्यासह विविध प्रोसेसधारक,उद्योजक उपस्थित होते.
धडक योजनेतून केलेल्या सहकार्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा बैठकीत सन्मान करण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







