इचलकरंजी रेल्वेसाठी आता ‘आरपारची लढाई’; खासदार धैर्यशील माने यांचा निषेध,जनजागृती करणार-आबा जाधव
इचलकरंजी, ता. २१ :
इचलकरंजी रेल्वेमार्ग रद्द करण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर रेल्वे कृती समिती आक्रमक झाली असून, खासदार धैर्यशील माने यांच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला. इचलकरंजीच्या रेल्वेसाठी यापुढे जनजागृती मोहीम आणि तीव्र आंदोलन छेडून ‘आरपारची लढाई’ लढण्याचा इशारा रेल्वे कृती समितीचे निमंत्रक अजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.
इचलकरंजी शहरातून मोठ्या प्रमाणात जीएसटी महसूल मिळत असतानाही शहराच्या विकासासाठी मंजूर झालेली रेल्वे प्रत्यक्षात साकार झालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचा शुभारंभही झाला होता. मात्र, त्यानंतर लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित पाठपुरावा झाला नसल्याचा आरोप समितीने केला.
नुकत्याच झालेल्या रेल्वेसंदर्भातील बैठकीत खासदार धैर्यशील माने उपस्थित असताना इचलकरंजी रेल्वेचा विषय चर्चेत आला. त्यावेळी त्यांनी ‘इचलकरंजीच्या रेल्वेचे काय झाले?’ अशी टिप्पणी केल्याचा दावा समितीने केला. रेल्वे रद्द झाल्याची बाब समोर आल्यानंतर खासदारांनी त्याच बैठकीत ठोस भूमिका घेणे अपेक्षित होते; मात्र तसे झाले नाही, असा आरोप अजय जाधव यांनी केला.
रस्ते व गटारींसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला जातो, मग इचलकरंजी रेल्वेसाठी आवश्यक राज्य शासनाचा वाटा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न का करीत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. रेल्वे प्रकल्पासाठी सर्वपक्षीय राजकीय नेते, सामाजिक संस्था, कार्यकर्ते, नागरिक, गणेश मंडळे तसेच आजी-माजी आमदार व खासदार यांना सोबत घेऊन व्यापक आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘इचलकरंजीत रेल्वे आणल्याशिवाय गप्प बसणार नाही,’ असा निर्धार समितीने व्यक्त केला.
पत्रकार परिषदेस अजय जाधव, रमेश शर्मा, नंदूजी बांगड, धर्मराज जाधव, मारुती पाटील, पांडुरंग पिसे, संदीप ढोले, विकी लोकरे, अशोक पाटणी, संजय चिंदके, दीपक पंडित, संतोष आडसुळे, महेंद्र जाधव, बाळासाहेब नरशेट्टी, बाळकृष्ण तोतला, प्रदीप कांबळे आदी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेत बोलताना आबा जाधव व इतर
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







