कै.भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेचे शानदार उद्घाटन,

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कै.भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धेचे शानदार उद्घाटन.

इचलकरंजी-
खो-खो पंढरी वस्त्रनगरी इचलकरंजीत सोमवारी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,उपसंचालक क्रीडा व युवक सेवा कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर, कोल्हापूर खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासनाच्या कै.भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धेला सोमवारी दिमाखात शुभारंभ करण्यात आला.
येथील विठ्ठल रामजी शिंदे प्रशालेच्या पटांगणावर सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे क्रीडानगरीत २४ ते २७ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे स्वागताध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि स्पर्धा समिती उपाध्यक्ष आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण व मैदानाचे पुजन करुन करण्यात आले. याप्रसंगी आयुक्त पल्लवी पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसुळ, क्रीडा अधिकारी अरुण पाटील, सुधीर निंबाळकर, प्रशांत पाटणकर  आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांनी केले. विश्‍वचषक खो-खो स्पर्धेतील भारतीय संघाची खेळाडू इचलकरंजीची सुवर्णकन्या वैष्णवी पोवार हिने सर्व खेळाडूंना शपथ दिली. सूत्रसंचालक युवराज मोहित व रोहित शिंगे यांनी केले.
यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, वस्त्रनगरीबरोबरच इचलकरंजीचा क्रीडानगरी म्हणून नांवलौकिक आहे. या शहराला मोठी क्रीडा परंपरा असून स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. सर्वाधिक संख्येने एखाद्या शहरातील खेळाडू शासकीय सेवेत विविध पदावर कार्यरत असणारे इचलकरंजी हे एकमेव शहर असल्याचे सांगितले. आमदार राहुल आवाडे यांनी, जो खेळाडू कर्तृत्व दाखवेल तोच यशस्वी ठरेल. त्यामुळे हार-जीत न मानता खिलाडूवृत्तीने खेळाचे प्रदर्शन करा. वस्त्रनगरीने सदैव खेळालाही प्राधान्य दिले असून भविष्यातही खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
तत्पूर्वी स्पर्धेत सहभागी सर्वच खेळाडूंची शहरातील मुख्य मार्गावरुन जल्लोषी स्वागत रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी पुतळा येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. वाद्यांच्या गजरात भगवे फेटे परिधान करुन सहभागी झाली होते. कॉ. मलाबादे चौक,श्री शिवतीर्थ ते छत्रपती राजर्षि शाहू पुतळा ते क्रीडांगण अशी रॅली काढण्यात आली. रॅली मैदानात आल्यानंतर सर्वच संघांनी पाहुण्यांचा मानवंदना दिली. त्यानंतर मैदान पुजन व हवेत फुगे सोडून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सुनिल पाटील, शेखर शहा, राजन उरुणकर, मौश्मी आवाडे, संजय शेटे, जी. जी. कुलकर्णी, संजय कुडचे, चंद्रकांत पाटील, उदय चव्हाण, पुंडलिक जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात दहा साखळी सामने पार पडले. त्यामध्ये महिला गटात धाराशिव, ठाणे, नागपूर नाशिक तर पुरुष गटात पुणे जिल्हा संघांनी त्याचबरोबर किशोर गटात धाराशिव, कोल्हापूर आणि किशोरी गटात सोलापूर व सांगली जिल्हा संघानी विजयी सलामी देत आपली घोडदौड सुरु केली. या स्पर्धेत खुला पुरुष व महिला गट तसेच किशोर व किशोरी वयोगटातील एकूण ४० संघांचा समावेश असून पुरुष व महिला संघांची अ, ब, क आणि ड या चार गटात विभागणी केली असून प्रत्येक गटात ३ संघ आहेत तर किशोर व किशोरी गटासाठी अ आणि ब असे प्रत्येकी दोन गट करण्यात आले असून प्रत्येक गटात ४ संघांचा समावेश आहे.
सकाळच्या सत्रात झालेल्या पुरुष अ गटातील पुणे विरुद्ध नागपूर हा सामना पुणे संघाने ८ गुणांनी जिंकला. तर क गटातील सांगली विरुद्ध सोलापूर संघातील सामना २६-२६ गुणसंख्येत बरोबरीत सुटला. महिला विभागातील अ गटातील धाराशिव विरुद्ध अमरावती सामना धाराशिव संघाने १ डाव ४ गुणांनी विजय मिळविला. ब गटातील अकोला विरुद्ध ठाणे या सामन्यात ठाणे जिल्ह्याने १ डाव ७ गुणांनी विजय प्राप्त केला. क गटातील पुणे विरुद्ध नागपूर या सामन्यात नागपूर संघाने १ डाव ९ गुणांनी विजय मिळविला. ड गटातील नाशिक विरुद्ध रत्नागिरी हा सामना नाशिक जिल्हा संघाने १ डाव तीन गुणांनी जिंकला.
किशोर अ गटात धाराशिव विरुद्ध नागपूर यांच्यातील सामन्यात धाराशिवने १ डाव ११ गुणांनी विजय मिळविला. ब गटातील कोल्हापूर विरुद्ध बुलढाणा यांच्यातील सामना कोल्हापूरने १ डाव १२ गुणांनी जिंकला. किशोरी अ गटातील नागपूर विरुद्ध सोलापूर यांच्यातील सामना सोलापूरने २ गुण व १ मिनिटे ३०सेकंद राखून जिंकला. ब गटामध्ये असणार्‍या बुलढाणा विरुद्ध सांगली यांच्यातील सामन्यात सांगलीने १ डाव ४ गुणांनी विजय प्राप्त केला.
मंगळवारी दोन्ही सत्रात साखळी सामने होतील तर बुधवारी सकाळच्या सत्रात बाद पध्दतीने आणि संध्याकाळी उपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात होईल. गुरुवारी सकाळच्या सत्रात तृतीय क्रमांकाचे सामने तर संध्याकाळच्या सत्रात अंतिम फेरीचे सामने होतील.
फोटो- इचलकरंजी शहरातून खो खो स्पर्धेतील खेळाडूंची रॅली काढण्यात आली त्यावेळी आ.राहुल आवाडे,सुनील पाटील, राजन उरुणकर,संजय शेटे,शेखर शहा,सचिन खोंद्रे व खेळाडू
खो खो स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी आ.राहुल आवाडे,मा.मंत्री प्रकाश आवाडे,आयुक्त पल्लवी पाटील व खेळाडू
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More