जातनिहाय जनगणनेची घोषणा पण तरतूद व तयारी नाही ,समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जातनिहाय जनगणनेची घोषणा पण तरतूद व तयारी नाही ,समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत

इचलकरंजी ता.५
 केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली. तसेच सामाजिक व्यवस्था लक्षात घेऊन घटनात्मक तरतुदीनुसार हा निर्णय घेतला असल्याचेही सांगितले. मात्र ती कधी होणार हे स्पष्ट केलेनाही. वास्तविक प्रमुख विरोधी पक्षाने संसदेत व प्रचारात जातनिहाय  जनगणनेची मागणी केलेली होती. आणि सत्ताधारी प्रमुख पक्षाचा जातनिहाय जातगणनेला विरोध आहे हे अगदी सर्वोच्च न्यायालयात त्यांनी मांडलेल्या भूमिकेतही स्पष्ट झाले आहे. आणि मा. पंतप्रधानांनीही देशात जातनिहाय जनगणना झाली तर दुहीची स्थिती निर्माण होईल असे जाहीर विधान काही महिन्यांपूर्वी केले होते.तसेच जातनिहाय जनगणना करण्यासाठीची आवश्यक तयारीही सरकारी पातळीवर दिसत नाही. जनगणनेसाठी किमान दहा हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. पण या वर्षीच्या अर्थसंकल्पात मात्र त्यासाठी केवळ ५७५ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. शिवाय ही घोषणा केल्यानंतर यासंबंधीच्या कोणत्याही प्रश्नांना पत्रकार परिषदेत उत्तरे दिली गेली नाहीत. त्यामुळे हा धक्कातंत्री निर्णय बिहार,गुजरातसह व इतर राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर केला असावा. तसेच इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडून लक्ष दुसरीकडे वळवण्याचाही प्रयत्न असावा. त्यामुळे विरोधी पक्षांचे मुद्दे पळवून नेणाऱ्या राजकारणा पलिकडे या गोष्टीवर तातडीने काही होईल असे दिसत नाही असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.” जातनिहाय जनगणनेची घोषणा”या विषयावर हे चर्चासत्र झाले. या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर,अशोक केसरकर, पांडुरंग पिसे, राजन मुठाणे ,नारायण लोटके, रामचंद्र ठिकणे, मनोहर जोशी आदींनी विचार व्यक्त केले.
या चर्चासत्रात असे मत व्यक्त झाले की ,शाश्वत विकासासाठी जनगणना महत्त्वाची असते. २०२१ ची जनगणना अद्याप झालेली नाही. जातनिहाय जनगणना हा देशाचा एक्स-रे असतो. देशातील सामाजिक व आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार पुढील धोरण ठरवण्यासाठी अशा जनगणनेची आवश्यकता निश्चितच आहे.ब्रिटिशांनी १८७१ मध्ये वायव्य प्रांत, मध्यप्रांत,बंगाल आणि मद्रास या चार प्रांतांमध्ये जातनिहाय जनगणना केली होती. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, राजपूत व अन्य जातींची आकडेवारी जमा केली होती. प्रशासकीय कामासाठी जातनिहाय वर्गीकरण करणे हा त्यांचा त्यावेळी होतो होता. त्यानंतर १९३१ ची जनगणना ब्रिटिशांनी जातनिहाय केली होती  त्यावेळी भारतामध्ये ४१४७ जाती असल्याचे स्पष्ट झाले होते. या चर्चासत्रात जातनिहाय जनगणना या विषयाच्या विविध अंगावर सर्व सहभागीने प्रकाश टाकला.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More