ICHMH51NEWS.IN
9921600800

   “मराठीला ज्ञानभाषा बनवण्याची गरज”- डॉ. राजन गवस इचलकरंजीत स्मृतीजागर सांगता समारंभात प्रतिपादन

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

   “मराठीला ज्ञानभाषा बनवण्याची गरज”-

डॉ. राजन गवस

इचलकरंजीत स्मृतीजागर सांगता समारंभात प्रतिपादन

इचलकरंजी, ता. २९ — आपल्या मातृभाषेत विचारप्रक्रिया विकसित होते; मात्र दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर कमी होत चालल्याने आपण स्वतःच आपल्या भाषेपासून दूर जात आहोत, असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी दिला. इचलकरंजी येथे आयोजित सुवर्णमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्मृतीजागर सांगता समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी स्मृतीजागरचे निमंत्रक दिलीप शेंडे होते, तर लातूरचे पोलीस उपअधीक्षक व कवी समीरसिंह साळवे विशेष उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. रोहित शिंगे यांनी केले. प्रसाद कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
मराठी भाषा जगातील समृद्ध व सुंदर भाषा असून ती ज्ञानभाषा बनवण्यासाठी जगभरातील विविध विषयांचे ज्ञान तत्परतेने मराठीत उपलब्ध करून देण्याची व्यवस्था निर्माण करण्याची नितांत गरज आहे, असे डॉ. गवस यांनी नमूद केले. मराठी शाळा बंद पडणे, शिक्षणातील बदलती प्रवृत्ती आणि मराठी समाजाची भाषेकडील उदासीनता ही चिंताजनक बाब असल्याचे ते म्हणाले. “आजची शिक्षण पद्धती कुतूहल संपवणारी ठरत आहे. समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी वरवरची मलमपट्टी नको, तर मोठी शस्त्रक्रिया करावी लागेल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मराठी संस्कृती, लोककला, संगीत व ग्रामीण परंपरेच्या मुळांपासून तुटणाऱ्या नव्या मध्यमवर्गावर भाष्य करत त्यांनी मराठी अध्यापनाची नवी परंपरा उभारण्याची गरजही व्यक्त केली. “मराठी भाषा अभिजात आहे; आपण आपल्या निर्णयाने या संपन्न भाषेला दरिद्री करू नये,” असा इशाराही त्यांनी दिला.
कार्यक्रमात समीरसिंह साळवे व दिलीप शेंडे यांनी मनोगते व्यक्त केली. गेल्या वर्षभर स्मृतीजागर उपक्रमातील बारा कार्यक्रमांत कृतिशील सहभाग घेतलेल्या कार्यकर्त्यांना डॉ. गवस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संकल्पक दिलीप शेंडे व दीपश्री शेंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. श्री गजानन महाराज सर्व सेवा संस्था यांच्या सहकार्याने झालेल्या दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवींचे कवीसंमेलन समीरसिंह साळवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कोल्हापूर जिल्ह्यासह परिसरातील साहित्यरसिकांकडून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आभार प्रदर्शन वैशाली नायकवडी यांनी केले.

स्मृतिजागर सांगता समारंभात बोलताना राजन गवस, व्यासपीठावर दिलीप शेंडे,समीरसिंह साळवे,प्रसाद कुलकर्णी, रोहित शिंगे

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा