श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षपूर्तीनिमित्त समाज प्रतिनिधींसमवेत बैठक
इचलकरंजी :
‘हिंद दी चादर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागम वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिख, सिंधी आणि शिकलगार समाज प्रतिनिधींसमवेत विशेष बैठक संपन्न झाली.
शालेय स्तरावर गुरु तेग बहादूर यांच्या जीवनकार्यावर आधारित गीतगायन स्पर्धा, प्रभातफेरी, निबंध स्पर्धा तसेच जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यांच्या बलिदानातून समाजात धार्मिक सहिष्णुता, मानवता आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश रुजविणे हा या उपक्रमांचा उद्देश असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.
बैठकीत खारघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती प्रतिनिधींनी दिली. शासनाच्या निर्देशानुसार शहरातील विविध समाज प्रतिनिधींना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आयुक्त पल्लवी पाटील यांनी यावेळी दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, विजय राजापुरे, दिलप्रीत सिंग, प्रकाश पंजवानी, शंकर मुलचंदानी, भारत लखमानी, सुरींदर मंगलानी, आम्रपाल सिंग कोहली, श्याम गुरुनानी, उत्तम सिंग बग्गा, पवन दीप सिंग, मनीष केसवानी आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे व समाजबांधव
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







