पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्याची आंदोलन अंकुशची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
इचलकरंजी:
पंचगंगा नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी तातडीने रोखण्यात यावे, अन्यथा नागरिकांच्या अस्तित्वाच्या प्रश्नावर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख श्री. धनाजी चुडमुंगे यांनी प्रशासनाला दिला आहे. याबाबत प्रांताधिकारी, इचलकरंजी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शिरोळ तालुक्यासह पंचगंगा नदीकाठावरील अनेक गावांची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा नदी सध्या गंभीर प्रदूषणामुळे मृतावस्थेत पोहोचली आहे. या नदीतील पाण्यामुळे काठावरील गावांतील नागरिक, शेती व पशुधन यांचे जीवन धोक्यात आले आहे.
या प्रदूषणास इचलकरंजी औद्योगिक वसाहतीतील प्रोसेस युनिट्स मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अनेक वेळा प्रक्रिया न करता किंवा अपुरी प्रक्रिया करून औद्योगिक सांडपाणी नदीत सोडले जाते. तसेच काहीवेळा बेट नदीमार्गेही हे प्रदूषित पाणी पंचगंगेत मिसळले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांत या प्रश्नावर आंदोलने, शासकीय उपाययोजना आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाया झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात नदी प्रदूषण थांबलेले नाही. कोरोनाच्या काळात उद्योग बंद असल्याने काही काळ प्रदूषण कमी झाले होते, मात्र उद्योग पुन्हा सुरू झाल्यानंतर परिस्थिती पूर्ववत झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
पंचगंगा नदीचे पाणी नागरिकांच्या पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच पशुधनासाठी वापरले जाते. त्यामुळे प्रदूषणामुळे संपूर्ण पंचगंगा काठावरील जनजीवन धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने येत्या १५ दिवसांत नदीत मिसळणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
निर्धारित कालावधीत कारवाई न झाल्यास नागरिक स्वतः पुढाकार घेऊन नदीत येणारे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी कोल्हापूर, प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ, तहसीलदार शिरोळ तसेच शिवाजीनगर, शहापूर (इचलकरंजी), कुरुंदवाड व शिरोळ पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.यावेळी शंकर जगदाळे,दीपक पाटील,नागेश काळे,रोहित पाटील,प्रभाकर बंडगर उपस्थित होते.
प्रांत दीपक शिंदे यांना निवेदन देताना आंदोलन अंकुशचे पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







