इचलकरंजीची हवा प्रदूषित; नागरिकांचे आरोग्य धोक्यात AQI 230 नोंद; तात्काळ उपाययोजनांची गरज
इचलकरंजी :
शहरातील हवेच्या गुणवत्तेबाबत चिंताजनक चित्र समोर आले असून २६ मार्च २०२६ रोजी महात्मा गांधी पुतळा परिसरात Air Quality Index (AQI) 230 इतका नोंदविण्यात आला आहे. हा स्तर ‘खराब’ (Poor) श्रेणीत मोडत असून नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असल्याचे स्पष्ट होते.
AQI सोबतच PM 2.5 चे प्रमाणही निर्धारित निकषांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्याचे निदर्शनास आले आहे. सूक्ष्म धूलिकणांचे (PM 2.5) वाढलेले प्रमाण थेट श्वसन संस्थेवर परिणाम करत असून, दीर्घकाळ याच पातळीवर हवा राहिल्यास हृदयविकार, फुफ्फुसांचे आजार, दमा तसेच इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर इचलकरंजी महानगरपालिका तसेच संबंधित पर्यावरण विभागाने तातडीने ठोस उपाययोजना राबविण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरातील धूळ नियंत्रण, रस्ते स्वच्छता, औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण, वाहनांच्या धुरावर निर्बंध तसेच हरित क्षेत्र वाढविणे यांसारख्या उपाययोजना तात्काळ हाती घ्याव्यात, अशी मागणी नागरिकांतून जोर धरत आहे.
दरम्यान, वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे. शहराची हवा पुन्हा स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





